तुळापूर येथे शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये गाड्याच्या दोन बैलांसह घोडीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!

Swarajyatimesnews

शेतकरी पोपट शिवले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; लाखोंचे नुकसान, शासकीय मदतीची जोरदार  मागणी

तुळापूर (ता. हवेली): तुळापूर परिसरामध्ये एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका प्रामाणिक शेतकऱ्याचा संपूर्ण गोठा जळून खाक झाला असून, गोठ्यात बांधलेल्या दोन उमद्या बैलांसह एका घोडीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आगीत शेतकरी पोपट राजाराम शिवले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले पशुधन डोळ्यांदेखत गेल्याने शिवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अन् क्षणात सर्व काही संपलं! कुटुंबाला अश्रू अनावर – शेतकरी आपल्या गोठ्यातील मुक्या प्राण्यांवर पोटच्या लेकरासारखा जीव लावतो. बैलाला शंभू महादेवाचा नंदी मानून त्याची अहोरात्र सेवा केली जाते. पोपट शिवले यांच्या घरातही या पशुधनाला कुटुंबातील सदस्यासारखाच दर्जा होता. मात्र, शॉर्ट सर्किटच्या एका ठिणगीने घात केला. आग एवढी भीषण होती की गोठ्यातील दोन बैल आणि एका घोडीला बाहेर काढण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत असून, शिवले कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित गावकऱ्यांचेही डोळे पाणावले होते.शेतकरी कुटुंबाने तिन्ही मृत प्राण्यांचा अंत्य विधी पारंपरिक पद्धतीने करत सुश्रुपूर्ण नयनांनी त्यांना निरोप दिला.

जखमी बैलावर उपचार सुरू, तलाठ्यांकडून पंचनामा – घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीतून वाचलेल्या एका जखमी बैलावर सध्या युद्धपातळीवर उपचार सुरू असून त्याला सलाईन लावण्यात आले आहे. तसेच स्थानिक तलाठ्यांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून नुकसानीचा आकडा मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.

शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी!” – किरण साकोरे

या अत्यंत संवेदनशील घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे यांनी तातडीने दखल घेत शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले:

“गोठ्यातील प्राण्यांवर शेतकरी पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करतो, त्यांना कधी काही कमी पडू देत नाही. कष्टाळू आणि प्रामाणिक शेतकरी पोपट शिवले यांच्या गोठ्यातील दोन बैल आणि एक घोडी या आगीत दगावली आहे. या कुटुंबावर कोसळलेले हे संकट न पेलवणारे आहे. शासनाने कोणत्याही लालफितीच्या कारभारात न अडकता, या गरीब शेतकऱ्याला तातडीने आणि भरीव आर्थिक नुकसान भरपाई मंजूर करावी, हीच आमची आग्रही मागणी आहे.” – किरण साकोरे (सदस्य, पुणे जिल्हा परिषद – लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!