कार्ला (ता. मावळ) दिनांक १मे – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वैयक्तिक स्वच्छतेसोबत प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छता ही अंगीकृत करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू” ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकानी आपली जबाबदारी ओळखून यशस्वी पार पाडावी असे प्रतिपादन अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी व्यक्त केले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू” या मोहिमेचा शुभारंभ कार्ला गावात झाला. या मोहिमेचे उद्घाटन राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना रौंदळ म्हणाले, “देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गावांमध्ये उभारण्यात आलेल्या कंपोस्ट खड्ड्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. त्यामुळे उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार होईल आणि त्यातून उत्पन्न व रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा होईल.”
कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग आप्पासाहेब गुजर, राज्य समन्वयक आशिष थोरात, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विकास कुडवे, उपसरपंच अभिषेक जाधव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सुभाष धोत्रे, तालुका समन्वयक मेधा दातरंगे व अनिता शिंदे, तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.