“नाती जोडली, मनं सांधली, ढेरंगे कुटुंबीयांसह पै – पाहुणे, सहकाऱ्यांसह निष्ठावंताची एकी कोमल ढेरंगे यांच्या पाठीशी उभी राहिली, कोरेगाव भीमात २५ वर्षांच्या राजकीय संघर्षाचा भावनिक समारोप ; निष्ठावंतांचा मान राखत विकासाचे नवीन राजकीय समीकरण
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) राजकारणाच्या धुराळ्यात अनेकदा रक्ताची नाती दुरावतात, मात्र जेव्हा तीच नाती पुन्हा एकत्र येतात, तेव्हा सत्तेची आणि विकासाची समीकरणे आपोआप बदलतात. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे असाच एक ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी सोहळा ‘माघ पौर्णिमेच्या’ शुभमुहूर्तावर पार पडला. गेल्या २५ वर्षांपासून राजकीय मतभेदांमुळे विखुरलेली ‘समस्त ढेरंगे परिवारातील अनेक कुटुंबे राजकारणामुळे दुरावली होती ती सर्व ‘ सर्व हेवेदावे विसरून अखेर एकत्र आली आहे. आप्त-स्वकीय आणि पै-पाहुण्यांच्या , मित्र, जिवलग,हितचिंतक , मार्गदर्शक व निष्ठावान सहकाऱ्यांच्या या अभेद्य एकीमुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत कोमल सत्यनारायण ढेरंगे यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला असून आपल्या सर्वांची एकी, जपूयात गावचे गावपण अन् नेकी, आता पंचायत समिती बाकी असे ठरवत गळा भेट घेत निष्ठेचा सोहळा रंगल्याचे दिसले.

‘भेटी लागे जिवा…’ २५ वर्षांचा राजकीय वनवास संपला! : सन २००० नंतर कोरेगाव भीमाच्या राजकारणात ढेरंगे कुटुंबीयांमध्ये दोन सत्ता स्थाने झाली होती. परस्परविरोधी विचारधारा आणि संघर्षामुळे कुटुंबाचे वर्चस्व असूनही अनेक राजकीय पदे हातातून निसटली होती. मात्र, माघ पौर्णिमेच्या रात्री निसर्गाच्या साक्षीनं साचलेली कटुता वाहून गेली. “भेटी लागे जिवा…” अशा भावूक वातावरणात जेव्हा भावकीतील दोन्ही गट एकमेकांना गळ्याला गळा लावून भेटले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा केवळ कौटुंबिक मेळावा नसून, तो गावाच्या प्रगतीसाठी दिलेला विजयाचा हुंकार ठरला.
जुने सहकारी आणि निष्ठावंतांच्या त्यागाची कदर : भावकी आणि आप्त-स्वकीय एकत्र आले असले, तरी त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांप्रती असलेली कृतज्ञता विसरलेली नाही. “मागील ४० वर्षांपासून गावातील सर्व समाजातील निष्ठावंत सहकारी आमच्या सुख-दुःखात सोबत आहेत. ही एकी कोणाला दाखवण्यासाठी नसून, गावच्या सकारात्मक विकासासाठी आहे. जुन्या सहकाऱ्यांच्या त्यागाची व निष्ठेची कदर करून, सर्वांना विचारत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत,” अशी ग्वाही ढेरंगे कुटुंबीयांनी दिली आहे.
कोमल ढेरंगे यांच्या रूपाने विजयाचा विश्वास’ : या अभूतपूर्व एकीचा थेट परिणाम आता पंचायत समिती निवडणुकीवर होणार आहे. कोमल सत्यनारायण ढेरंगे यांच्या पाठीशी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच आपली शक्ती उभी केली आहे. “आता आमची एकी… फक्त पंचायत समितीचा गुलाल बाकी!” असा आत्मविश्वास व्यक्त करत विजयाचा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी ‘अडवा-अडवी’च्या राजकारणाला पूर्णविराम देऊन विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
“आम्ही रक्ताची नाती आणि मैत्रीची नाती एकत्र घेऊन ही वज्रमूठ बांधली आहे. भावकीची ही ‘एकी’ आणि कामातील ‘नेकी’ यापुढेही कायम जपली जाईल.” असा विश्वास ढेरंगे कुटुंबीयांसह पै – पाहुणे, जुन्या सहकाऱ्यांसह कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी व्यक्त केला
२५ वर्षांच्या खंडानंतर झालेली ही ‘ऐतिहासिक एकी’ कोमल सत्यनारायण ढेरंगे यांना पंचायत समितीच्या सभागृहात सन्मानाने पाठवणार का? याचे उत्तर येणारा काळच देईल, मात्र या घडामोडीमुळे शिरूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सध्या तरी कोरेगाव भीमाचीच चर्चा रंगली आहे.
6
