भक्तीचा सोहळा, मायेचा ओलावा! सविता श्रीकांत गावडे यांच्या माध्यमातून भाविकांना ‘अष्टविनायक वारी’ची अनोखी भेट

Swarajyatimesnews

 गावडे दांपत्याच्या सेवाभावाचे  ह.भ.प. अर्चना हेमंत नेवकर यांच्याकडून कौतुक

ओझर –  राजकारणात सत्ता आणि पद मिळवणारे अनेक असतात, पण जनसेवेचा वसा घेऊन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व दुर्मिळ असते. वाडे बोल्हाई येथील माजी उपसरपंच आणि खंबीर महिला नेतृत्व  सविता श्रीकांत गावडे यांनी आपल्या सेवावृत्तीतून हेच सिद्ध केले आहे. सविता गावडे आणि श्रीकांत गावडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘विनामूल्य अष्टविनायक दर्शन’ यात्रेमुळे परिसरातील माता-भगिनींच्या आयुष्यात आनंदाचा आणि भक्तीचा सुवर्णकाळ अवतरला आहे.

‘धन्य काळ संत भेटी…’ – ओझर नगरीत हरिनामाचा गजर –  अष्टविनायक यात्रेचा पहिला मुक्काम श्री क्षेत्र ओझर येथे झाला. यावेळी सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात ह.भ.प. अर्चना हेमंत नेवकर यांचे सुश्राव्य कीर्तन रंगले. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ‘धन्य काळ संत भेटी। पायीं मिठी पडिली तो॥’ या अभंगावर निरूपण करताना त्यांनी गावडे दांपत्याच्या कार्याचा गौरव केला. “समाजात सधनता अनेकांकडे असते, पण धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याची इच्छाशक्ती फार कमी लोकांकडे असते. सविता गावडे वहिनींसारखी सेवा आणि समर्पण आजच्या काळात महत्त्वाची ठरत आहे,” अशा शब्दांत नेवकर यांनी त्यांच्या दातृत्वाची पावती दिली.

  • गावडे दांपत्याची सेवा: जणू भाविकांसाठी मायेची सावलीकेवळ यात्रा आयोजित करून न थांबता, सविता गावडे यांनी प्रत्येक भाविकाची घरच्या सदस्याप्रमाणे काळजी घेतली. यात्रेतील नियोजनाने सर्वांची मने जिंकली.
  • आरामदायी प्रवास : प्रवासासाठी आरामदायी बस व्यवस्था.
  • मायेची पंगत: चहा, नाष्टा आणि दोन्ही वेळच्या दर्जेदार भोजनाची घरगुती सोय.
  • आध्यात्मिक शिदोरी: मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनाचे आयोजन करून भाविकांना मानसिक शांतता दिली.

राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय – सविता श्रीकांत गावडे यांनी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. मात्र, या वारीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांशी असलेले आपले घट्ट नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. सहभागी महिलांनी “आमच्या लेकीनेच आम्हाला देवदर्शन घडवले” अशा भावना व्यक्त केल्या, ज्या सविता गावडे यांच्या वाढत्या जनसंपर्काची आणि लोकप्रियतेची साक्ष देतात.

स्वप्नांची ‘नाव’ लागणार किनाऱ्याला! – कीर्तनादरम्यान ह.भ.प. नेवकर यांनी एक मार्मिक दाखला दिला. त्या म्हणाल्या, “जशी ही भक्तीची नाव (दर्शन यात्रा) भाविकांना घेऊन निघाली आहे, तशीच ही नाव सविता वहिनींना यशाच्या शिखरापर्यंत आणि भगवंताच्या दारापर्यंत पोहोचवेल.”

या यात्रेत यावेळ शालिनी नारायण भोर,नंदा शिवाजी भोर ,कुसुम अंकुश भोर , जयश्री विजय शिंदे ,छाया विठ्ठल गावडे , अलका कुशाबा गावडे , कुसुम मारूती गावडे शर्मिला दत्तात्रय खुळे ,हिराबाई जयवंत गावडे,मैनाबाई सदाशिव भोसले ,शालन प्रकाश कामठे,सुलभा शांतीलाल गावडे,यमुनाबाई शिंदे,लता विठ्ठल इंगळे ,सविता सतीश शिंदे यांच्यासह वाडे बोल्हाई परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 “अष्टविनायक दर्शन घेण्याचे आमचे स्वप्न होते, पण सविता वहिनींनी ज्या आपुलकीने आमची काळजी घेतली, त्यामुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला आहे.” — सहभागी महिला भाविक, वाडे बोल्हाई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!