”पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार’! कोरेगाव भिमा – पेरणे येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटला

Swarajyatimesnews

कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटल्याने १७८३ हेक्टर शेतजमीन,अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तर ग्रामस्थांकडून तातडीने नवीन बंधारा बांधण्याची मागणी

दिनांक २० जून २०२५  कोरेगाव भीमा (ता. शिरूर): शिरूर आणि हवेली तालुक्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या भीमा नदीवरील, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) आणि पेरणे (ता. हवेली) दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा महत्त्वाचा बंधारा अखेर फुटला आहे! बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असून, पेरणे बाजूकडील नदीचा किनाराही पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून गेला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि योग्य वेळी बंधाऱ्याची दुरुस्ती व देखरेख न केल्यानेच ही गंभीर परिस्थिती उद्भवली असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजाराम आहेर यांनी उन्हाळ्याचे शेवटचे रोटेशन संपल्यानंतर सततचा पाऊस चालू झाल्याने ७ जून पर्यंत लोखंडी ढापे काढण्याचे नियोजन असते.बंधाऱ्याची रुंदी कमी असल्याने आपल्याला मशीन नेता येत नाही.ढापे काढायला वेळच मिळाला पाण्यामुळे काम करता आले नसल्याचे सांगितले.

 ४४५७ एकर शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची भविष्यातील चिंता: १९८५ मध्ये बांधकाम सुरू होऊन १९८८ मध्ये पूर्ण झालेल्या या ३७ वर्षे जुन्या बंधाऱ्यावर भीमा नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील १७८३ हेक्टर म्हणजेच ४,४५७ एकरहून अधिक शेती ओलिताखाली येत होती. याशिवाय, कोरेगाव भीमा आणि पेरणे परिसरातील मोठ्या प्रमाणावर झालेले नागरीकरण, अनेक उद्योगधंदे आणि आजूबाजूच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना याच बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

बंधारा फुटल्याने हा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. जर तातडीने नवीन बंधारा बांधला गेला नाही, तर आगामी काळात कृषी, उद्योग आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवणे कठीण होऊन, त्याचे गंभीर परिणाम नागरी जीवनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, प्रशासनाने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन, युद्धपातळीवर नवीन बंधारा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून तीव्रपणे करण्यात येत आहे.

शिरूर आणि हवेली तालुक्याच्या विकासाचे प्रतीक असलेल्या या बंधाऱ्याची तातडीने पुनर्बांधणी करून, परिसरातील शेती, उद्योग आणि नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आणावे, अशी अपेक्षा नागरिक आणि ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर! या बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याचे आणि तातडीने दुरुस्त करण्याची मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने २७ मे २०२५ रोजीच पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करून केली होती.

“कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या वतीने २७ में २०२५ रोजी पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. पाटबंधारे विभागाने या पत्राला संवेदनशीलता आणि कार्यतत्परता दाखवायला हवी होती. वेळेत दुरुस्ती केली असती तर आज ही वेळ आली नसती.” बंधारा फुटल्याने पेरणे बाजूला असणारा भीमा नदीकाठ मोठ्या प्रमाणात कोरला गेला आहे.प्रशासनाने तातडीने नवीन बंधारा बांधून देत भविष्यातील नागरिकांचे व उद्योगधंद्याचे नुकसान टाळावे. – सरपंच संदिप ढेरंगे, ग्राम पंचायत कोरेगाव भिमा

संबंधित कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याची की वॉल पावसाच्या पाण्याच्या दाबाने वाहून गेली असून सदर दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात येणार असून याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल. – राजाराम आहेर, शाखा अधिकारी, कोंढापुरी पाटबंधारे शाखा,शिक्रापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!