रायगड, दि. २३ मार्च — कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. त्यांनी ३१ मे २०२५ पर्यंत हटवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत उभारलेली वाघ्या कुत्र्याची समाधी ही शिवकालीन इतिहासात कुठेही नमूद नाही. भारतीय पुरातत्त्व विभागानेही या समाधीच्या ऐतिहासिक महत्त्वाचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण आहे.कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत अशा कपोलकल्पित पात्राची समाधी असणे ही श्रद्धेची विटंबना आणि महाराजांची प्रतारणा आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ही संरचना हटवणे आवश्यक असल्याचेही नमूद करत ही समाधी कायमस्वरूपी हटवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.