कोरेगाव भिमा – पेरणे बंधारा की वॉल गेली वाहून, नंतर पाहणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले धावून

Swarajyatimesnews

शेतकऱ्यांचे डोळे पाणावले, पण अधिकाऱ्यांचे डोळे पाहणीतच रमले, पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह ???

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) आणि पेरणे (ता.हवेली) येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पावसाच्या पाण्याच्या  प्रवाहात ढापे न काढल्याने व वेळेत योग्य ती दुरुस्ती न झाल्याने फुटून गेला. सदर बंधारा फुटल्याने अधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा सकाळी सकाळी भेट देत पाहणीची कार्यतत्परता दाखवली पण हीच कार्य तत्परता बंधाऱ्याचे ढापे काढण्यासाठी व वेळेत योग्य ती दुरुस्ती करण्यात तसेच नविन बंधारा बांधण्यासाठी संवेदनशीलता दाखवण्याची नितांत गरज असताना दुर्घटना घडून गेल्यावर पाहणी करण्यासाठी आल्याने बंधारा की वॉल गेली वाहून, नंतर पाहणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले धावून अशी अवस्था पाहायला मिळाली.

     भिमा नदीवरील ३७ वर्षांपूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्याची  संरक्षक भिंत (की वॉल) पूर्णपणे वाहून गेल्याने परिसरातील १७८३ हेक्टर शेती, पिण्याच्या पाणी योजना आणि अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आणि ‘होईल तेव्हा पाहू’ या धोरणाचा हा परिणाम असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

साहेब वेळेत ढापे काढले असते तर :  बंधाऱ्याचे ढापे वेळेवर काढले नाहीत, तसेच त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने ती गांभीर्याने घेतली नाही. बंधारा फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी सकाळी सकाळीच आले… पण तोपर्यंत की वॉल वाहून गेली होती जर त्यांनी अगोदर उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. बंधाऱ्याच्या देखभालीकडे इतकी वर्षे केलेल्या दुर्लक्षाचाच हा परिणाम असल्याचे या घटनेतून दिसत असून यापुढे तरी पाट बंधारे विभाग जागे होणार का ? तातडीने दुरुस्ती व नवीन बंधारा बांधकामास मंजुरी आणत पूर्णत्वास नेणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या दुर्घटनेनंतर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आश्विन पवार यांनी पाणी ओसरल्यावर दुरुस्ती करणार असल्याचे आणि नवीन बंधाऱ्याचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, याआधी केलेल्या वारंवारच्या विनंत्यांकडे प्रशासनाने दुर्लक्षच केले होते, हे स्थानिक विसरलेले नाहीत. या पाहणीवेळी सहाय्यक अभियंता आश्विन पवार, कार्यकारी अभियंता जाधव साहेब, कार्यकारी शाखा अधिकारी राजाराम आहेर, कालवा निरीक्षक आशा झगडे, आरती घावटे, आवटे मॅडम, भदाणे मॅडम,  आदर्श सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, अमोल गव्हाणे, विलास गव्हाणे, मधुकर ढेरंगे, नितीन ढेरंगे, सुनील सव्वाशे, राजेंद्र शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर चिंतेची भावना स्पष्ट दिसत होती, पण त्याचबरोबर पाटबंधारे  खात्याच्या कार्यक्षमतेवरचा उपहासही त्यांच्या नजरेतून लपत नव्हता. “पाणी गेलं, की वॉल गेली, नंतर कोरडे नदीचे पात्र शिल्लक राहिल्यास पिके , जनावरे, उद्योग व पिण्याच्या पाण्याचे करायचे काय? असे अनेक प्रश्न त्यांच्या नजरेत दिसत होते आणि निराशाजनक चेहऱ्यावर अधिकऱ्यांची बोलघेवडे आश्वासनं शिल्लक राहिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “बंधारा फुटल्यानंतर प्रशासन धावणार असेल, तर नुसते भेट देत पाहणी करण्याचा दिखाऊपणा हवाय तरी कशाला हवाय?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यात असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!