‘एमपीएससी’ परीक्षेत १६ वेळा अपयश पण.. झाडू कामगार महिलेची लेक अखेर झाली मोठी अधिकारी

Swarajyatimesnesws

“आईच्या झाडूतून उडालेल्या धुळीतून उगवला यशाचा सूर्य!”, संघर्ष, जिद्द आणि मातृछत्राखाली घडलेली प्रेरणादायी कहाणी

कोपरगाव – “अपयश कितीही आले तरी प्रयत्न थांबवू नयेत,” हे ब्रीद अंगीकारून जगणाऱ्या एका झाडू कामगार महिलेच्या लेकीने अखेर आपल्या परिश्रमांच्या जोरावर एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवून दाखवले. तब्बल १६ वेळा अपयश पदरी पडलं, तरी हार न मानता घेतलेली झुंज अखेर यशस्वी ठरली. या तरुणीचे नाव आहे उषा गंगाधर पवार — मालेगाव तालुक्यातील सातमाने गावची माहेरवाशीण आणि कोपरगाव नगरपालिकेत झाडू काम करणाऱ्या अहिल्याबाई पवार यांची मुलगी.(MPSC)

गुरुवारी रात्री राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागल्यावर सुभाषनगरमधील त्यांच्या झोपडीतील वातावरण एकदम बदलले. अठरा विश्व दारिद्र्यात जगणाऱ्या या कुटुंबात “आनंदाचे डोह, आनंद तरंग” अशी स्थिती निर्माण झाली. उषाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी यांची रीघ लागली.

उषाच्या वडिलांचे निधन सोळा वर्षांपूर्वी झाले. त्याआधी तब्बल नऊ वर्षे ते अर्धांगवायूच्या आजाराने खंगले होते. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आई अहिल्याबाई यांच्यावर आली. नगरपालिकेत कंत्राटी झाडू कामगार म्हणून त्यांनी कुटुंबाचा संसार चालवला. मोठा भाऊ ज्ञानेश्वर बूट पॉलिशचे काम करून आईला हातभार लावतो. उषा पाच भावंडांमध्ये सर्वात लहान असून, लहानपणापासूनच “अधिकारी होण्याचे” स्वप्न तिने डोळ्यांत साठवले होते.

उषाचे शिक्षण कोपरगाव नगरपालिका शाळेत झाले. इंग्रजी विषयात कला शाखेची पदवी तिने कोपरगावमध्ये घेतली आणि नंतर नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती पुण्यात गेली. गेल्या दहा वर्षांत तिने राज्यसेवा, पोलीस उपनिरीक्षक, कर निरीक्षक, गट ब आणि गट क अशा विविध पदांसाठीच्या परीक्षा दिल्या — **१६ वेळा मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचली, पण यश हुलकावणी देत राहिले.**

तरीदेखील ती खचली नाही. खर्च झेपेनासा झाल्यावर पुणे सोडून संगमनेर येथे ती मैत्रिणींसह राहू लागली. तेथे लायब्ररीत दिवसाचे बारा ते सोळा तास ती अभ्यासात गुंतली. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी मेसमध्ये चपात्या लाटणे, भांडी घासणे अशी कामे करत अभ्यास सुरू ठेवला. तिच्या अथक परिश्रमांचे चीज अखेर या वर्षी झाले — राज्यसेवा मुख्य परीक्षेत ती पहिल्यांदा उत्तीर्ण झाली आणि मुलाखतही उत्तम झाली.अंतिम निकालात अनुसूचित जाती संवर्गात १४ वी रँक मिळवत तिला वर्ग-१ अधिकारीपदाची संधी मिळणार आहे.

उषाच्या या यशाने तिच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. आईच्या झाडूने उपसलेल्या धुळीतून मुलीने उज्ज्वल भविष्याचा मार्ग तयार केला — ही गोष्ट कोपरगाव, मालेगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

माझं स्वप्न पूर्ण झालं… आईचं आयुष्य आता सुकर व्हावं, एवढंच मला हवंय,” असं भावनिक मत उषा पवार यांनी व्यक्त केले.ही यशोगाथा केवळ एका मुलीच्या यशाची नाही, तर संघर्ष, चिकाटी आणि मातृत्वाच्या सामर्थ्याची साक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!