काळाचा घाला! आई-वडिलांविना कष्टातून आयुष्य फुलवले, पण हृदयविकाराने प्रदीप ढेरंगेंना हिरावले

Swarajyatimesnews

कोरेगाव भीमावर शोककळा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कोरेगाव भिमा (ता. शिरूर): आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाला सामोरे जाऊन, मोठ्या हिमतीने स्वतःचा संसार आणि शेती फुलवलेल्या कोरेगाव भीमा येथील मनमिळावू, कष्टकरी आणि हसतमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप ढेरंगे (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) यांचे मध्यरात्री ३ वाजता आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या धक्कादायक बातमीने कोरेगाव भीमा आणि पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे, तर एका उमद्या तरुणाच्या अकाली निधनाने आरोग्याची काळजी घेण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले, तरी हिंमत हरले नाहीत –  प्रदीप ढेरंगे यांचे लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे पोरकेपणाचे दुःख सोसत त्यांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने स्वतःला सावरले. त्यांनी केवळ शेतीच केली नाही, तर तिला आधुनिकतेची जोड देऊन फुलवले. त्यांच्या या प्रवासात पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या संसारवेलीवर दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन गोंडस फुले बहरली होती. आता कुठे सुखाचे दिवस सुरू झाले आहेत, आयुष्याने स्थैर्य घेतले आहे असे वाटत असतानाच, नियतीने त्यांच्यावर घाला घातला. रात्री अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे जीवनकार्य अनपेक्षितपणे थांबले.

ढेरंगे परिवारावर दुःखाचा डोंगर – प्रदीप ढेरंगे यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा, चुलते, चुलत भाऊ आणि मित्र परिवार असा मोठा आप्तस्वकीयांचा परिवार दुःखात बुडाला आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे ते पंचक्रोशीत सर्वांच्याच परिचयाचे होते. त्यांच्या निधनाने कोरेगाव भीमा परिसरातील एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला समाज मुकला आहे.

तरुणांचा आरोग्यविषयक प्रश्न ऐरणीवर –  प्रदीप ढेरंगे यांच्यासारख्या तरुण आणि कार्यरत व्यक्तीचे हृदयविकाराने निधन झाल्याने, आजच्या काळात आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वाढता ताणतणाव, बदललेली जीवनशैली आणि आहाराच्या सवयी यामुळे तरुण वयातही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रदीप ढेरंगे यांचे निधन हे समाजासाठी एक धोक्याची घंटा असून, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे, संतुलित आहार घेणे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!