दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन 

Swarajyatimesnews

शिरूर पोलिसांचे नागरिकांतून  कौतुक!

शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील गंठण चोरी – दिनांक ११ मे २०२५ रोजी, रूपाली अनिल काळे (रा. जळोची, बारामती) या महिलेचे शिरूर एसटी स्थानक परिसरातून सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे, ६.१ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरीस गेले होते. या चोरीमागे मनिषा विजय कसबे व शोभा शंकर दामोदर(रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) या दोन महिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

शिरूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ३१७/२०२५अन्वये या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हा २: वृद्धेला फसवून दागिन्यांची चोरी – दुसऱ्या घटनेत, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी, छबुबाई नारायण बनसोडे (रा. शिरूर) या वृद्ध महिलेला “आजी” असे बोलवून दिशाभूल करत तिच्या गळ्यातील ७८ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र व कानातले लंपास करण्यात आले होते. या गुन्ह्यात गुजरात आणि नागपूर येथील पाच सदस्यीय टोळीचा सहभाग होता.

गुन्हा क्र. ९६५/२०२४ अंतर्गत दाखल असलेल्या या प्रकरणात हरी बावरी राठोड, सुरज व राहुल राजपूत, गौरांग पटेल (सर्व रा. गुजरात) आणि बबलु सोलंकी (रा. नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खात्रीशीर तपास करून ही गुंतागुंतीची कामगिरी यशस्वी केली.

चोरीचा मुद्देमाल अखेर मालकांच्या हातात! वरील दोन्ही गुन्ह्यात हस्तगत केलेले सोन्याचे दागिने मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, दिनांक २४ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते रूपाली काळे व छबुबाई बनसोडे या मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले दागिने परत मिळाल्याने दोन्ही कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले.

पोलिसांचे उल्लेखनीय कार्य – या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

या तपासात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस हवालदार बापू मांगडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे गुन्हे उघडकीस आले आणि आरोपींना जेरबंद करणे शक्य झाले.जनतेकडून शिरूर पोलिसांचे अभिनंदन जी सदर दोन्ही प्रकरणातील फिर्यादींनी आणि स्थानिक नागरिकांनी शिरूर पोलिसांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. अशा कार्यक्षम पोलीस यंत्रणेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा आणि कायद्यावरील विश्वासाचा भाव अधिकच दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिरूर पोलीस दलाच्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!