हडपसर (ता. हवेली): अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल परमात्म्याच्या वारी सोहळ्यात हडपसर येथे एक माणुसकी आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत, पॅकोलाइन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फराळाचे वाटप केले.
कंपनीचे मालक बाझील शेख आणि एचआर राजीव नायर यांच्या वतीने वारकऱ्यांना गरमागरम साबुदाणा वडा, चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन निघालेल्या या वारकऱ्यांना प्रवासात मिळालेल्या या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला.
यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी पॅकोलाइन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचे बाझील शेख आणि राजीव नायर यांचे अभिनंदन करत त्यांच्या या सेवेचे कौतुक केले.
बाझील शेख यांनी यावेळी बोलताना पंढरीची वारी ही महाराष्ट्राची अस्मिता असून, माणुसकी धर्म जागवणारी समतेची वारी आहे, असे भावनिक मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा ही मानवता धर्माची सेवा आहे आणि यातून खूप मोठे समाधान मिळते.”