अख्ख कुटुंब संपलं; धाराशिवमधील मन सुन्न करणारी घटना
धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाईन रम्मीच्या नादातून कर्जबाजारी झालेल्या 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
लक्ष्मण मारुती जाधव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश नावाचा दोन वर्षांचा मुलगा होता. सुरुवातीस कुटुंब सुखात राहत होते. मात्र, लक्ष्मण ऑनलाईन रम्मी गेम आणि शेअर बाजारात पैसे गुंतवत होता. यामुळे त्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
या नुकसानामुळे लक्ष्मणवर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वतःची जमीन आणि काही दिवसांपूर्वीच घरही विकले. तरीही कर्ज मिटले नाही. या आर्थिक अडचणीतून हताश होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. नेमके कारण पोस्टमार्टेम अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.