दौंड (पुणे): आषाढी वारीच्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जून रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरकडे जाण्यासाठी चारचाकी वाहनातून निघालेले एक कुटुंब स्वामी चिंचोली येथील एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी कुटुंबावर हल्ला केला. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून कुटुंबियांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि वाहनातून खाली उतरलेल्या तीन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने (डोरलं, कर्णफुले, मंगळसूत्र) अमानुषपणे ओरबाडून नेले. या लूटीमध्ये सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने लंपास झाले.
या घृणास्पद घटनेनंतर आरोपींनी कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला चहाच्या टपरीमागे असलेल्या नाल्याकडे नेले आणि शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराने संबंधित मुलगी आणि तिचे कुटुंबीय पूर्णपणे हादरले आहेत.
या घटनेमुळे दौंड परिसरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आषाढी वारीसाठी सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असताना आणि दौंड पोलिसांची गस्त सुरू असतानाही हा घृणास्पद प्रकार घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, यापूर्वीही आषाढी वारीदरम्यान बोगस पास विकून भाविकांची फसवणूक झाल्याचा प्रकार सासवड परिसरात समोर आला होता. वारकऱ्यांसोबत घडणाऱ्या या घटनांमुळे वारीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.