चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) यांचा रविवारी पहाटे कारवार तालुक्यातील हाणकोण येथे पाच ते सहा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारींच्या सहाय्याने झालेल्या या हल्ल्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वृषाली नाईक या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.
विनायक नाईक हे सातेरी देवीच्या उत्सवानिमित्त मूळ गावी आले होते. रविवारी सकाळी पुण्याकडे जाण्याची तयारी करत असताना, सकाळी साडेपाचच्या सुमारास चार ते पाच अनोळखी मारेकऱ्यांनी मोटारीतून येऊन त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने प्रतिकाराचा प्रयत्न केला, मात्र त्याही जखमी झाल्या.
घटनेची नोंद सदाशिवगड पोलिस स्थानकात झाली असून, कारवारचे पोलिस अधीक्षक के. नारायण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. उपअधीक्षक गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी पथक स्थापन करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.