महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) न्यायाधीश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बीड जिल्ह्यातील ऋचा विठ्ठल कुलकर्णी यांनी पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले असून, न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ॲड गणेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली. त्यांच्या या यशामागे त्यांच्या आई-वडील, आजी आणि कुटुंबियांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले असून शेतकऱ्याच्या मुलीने आलेल्या आव्हानांवर व अडचणींवर मात करत न्यायाधीश पदी निवड होणार असल्याने यातून ग्रामीण भागातील अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.
एलएलबीचे शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश व्हायचे स्वप्न पाहिले होते. ग्रामीण भागातून यश मिळविणे कठीण होते. मात्र अॅड. गणेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनामुळे कायद्याच्या अभ्यासात पारंगत झाले त्यामुळे यश मिळवता आले. या सोबतच आई-वडील, आजी व कुटुंबीयांचे प्रोत्साहन यामुळे शक्य झाले.
कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ ची परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. कोरोनानंतर ९ सप्टेंबर २०२३ ला परीक्षा झाली. २४ ऑगस्ट २०२४ ला मुख्य परीक्षा झाली. त्यातील ३४३ उमेदवारांची मुलाखतींसाठी निवड झाली होती.
१७ ते २९ मार्च या काळात मुलाखती पार पडल्या. शनिवारी (ता. २९) अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात ११४ जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी तात्पुरती निवड झाल्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. अंतिम निवड यादी लवकरच एमपीएससी जाहीर करणार आहे.
राज्यात मुलींचा डंका- बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविले आहे. ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली आली आहे. सायली संपत झांबरे द्वितीय, किरण संभाजी मुळीक ही तिसरी आली. तसंच, या निकालात पहिल्या दहा टॉपर्समध्ये नऊ मुलींचा समावेश आहे, यामध्ये शिवाणी रामनाथ फाडोळ, तन्वी रहेमान शेख, सोनिया अविनाश गंधले, तनुज रमेश कुसारे, सुवर्णा विनायक शास्त्री, वंदना अरविंद चामले, किरण शांताप्रसाद वर्मा, विपुल एकनाथराव गुंजाळ, अनिकेत लिंबाराव कोकरे आदींचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे.