मांड्या, कर्नाटक: सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना कर्नाटकातील मांड्या येथे समोर आली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी फेसबुकवर मित्र झालेल्या एका तरुणाशी चॅटिंग करत लॉजवर भेट झालेल्या व त्याबाबत झालेल्या वादाने विवाहित महिलेची निर्घृण हत्या केली आहे. एकत्र राहण्याच्या हट्टातून हा भयानक गुन्हा घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय प्रीती हिने गेल्या गुरुवारी (२० जून २०२५ रोजी) करोतीग्राम येथील पुनीतला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही तासांतच त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली. शुक्रवारी (२१ जून रोजी) त्यांच्यातील संवाद वाढला, तर शनिवारी (२२ जून रोजी) त्यांनी फोनवर बराच वेळ गप्पा मारल्या. रविवारी (२३ जून रोजी) प्रीती हासनहून पुनीतसोबत म्हैसूरला पोहोचली आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
म्हैसूरमध्ये फिरल्यानंतर, या दोघांनी के.आर.एस. जवळील एका लॉजमध्ये खोली घेतली. सूत्रांनुसार, इथे त्यांचे शारीरिक संबंधही झाले. मात्र, वेगवान सुरू झालेली ही प्रेमकहाणी लवकरच एका भयाण वळणावर थांबणार होती.
एका हट्टामुळे घडला भीषण अंत: लॉजमधून बाहेर पडल्यानंतर पुनीत प्रीतीला परत सोडण्यासाठी निघाला. मात्र, वाटेत के.आर. पेटजवळ आल्यावर प्रीतीने त्याच्यासोबत कायम एकत्र राहण्याचा हट्ट धरला. पुनीतने वारंवार समजावून सांगूनही ती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे संतापलेला पुनीत तिला निर्जन कतारघट्टा जंगलात घेऊन गेला. तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. पुनीतने नकार दिल्यावर प्रीतीने त्याची चेष्टा केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कदाचित याच थट्टेमुळे पुनीतचा पारा आणखी चढला.
संतापलेल्या पुनीतने आधी प्रीतीच्या थोबाडीत मारली, त्यामुळे ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर त्याने जवळच पडलेला एक जड दगड उचलून तिच्या डोक्यावर वार केले. एकामागून एक वार झाल्याने काही क्षणातच प्रीतीचा जीव गेला. फेसबुकवरील मैत्री आणि पहिल्याच भेटीचा असा दुर्दैवी अंत झाला.
हत्येनंतर मृतदेह शेतात पुरला: हत्येनंतर पुनीतने प्रीतीचा मृतदेह त्याच्या गावी नेला आणि स्वतःच्या शेतात पुरला. मात्र, कोणताही गुन्हा जास्त काळ लपून राहात नाही, हेच पुन्हा सिद्ध झाले. पोलिसांनी आरोपी पुनीतला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीती विवाहित असून ती दोन मुलांची आई होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
मंड्याचे एसपी मल्लिकार्जुन बालदंडी यांनी सांगितले की, “पुनीत हा करोतीग्रामचा रहिवासी आहे. तो एका आठवड्यापूर्वीच फेसबुकद्वारे प्रीतीला भेटला होता. रविवारी तो तिला हासनहून घेऊन आला. दोघेही के.आर.एस. लॉजमध्ये राहिले. मात्र, प्रीतीने त्याच्यासोबत जास्त वेळ एकत्र घालवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात हत्येची घटना घडली.” पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावरील अनोळखी मैत्रीचे धोके या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत.