महाराष्ट्राच्या१९ वर्षीय देवव्रत रेखेनेने २०० वर्षांत न जमलेला ‘दंड कर्म पारायण’चा विक्रम

Swarajyatimesnews

वेदमूर्ती उपाधीने सन्मानित; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहिल्यानगरच्या या तेजस्वी विद्यार्थ्याचे विशेष कौतुक.

काशी/पुणे: संस्कृत, वेद आणि शास्त्रांच्या अभ्यासासाठी जगभरातून विद्यार्थी येत असलेल्या काशी नगरीत महाराष्ट्राच्या एका १९ वर्षीय मुलाने २०० वर्षांतील सर्वात मोठा आणि अत्यंत कठीण असलेला ‘दंड कर्म पारायण’**चा अभ्यास पूर्ण करून इतिहास रचला आहे. अवघ्या १९ वर्षांच्या या मुलाचे नाव देवव्रत महेश रेखे असून, त्याच्या या अलौकिक कामगिरीबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

२०० वर्षांनंतर पूर्ण झाले ‘दंड कर्म पारायण’ : दंड कर्म पारायण म्हणजे यजुर्वेदाच्या जवळपास २००० मंत्रांचा विशेष विधीने पाठ करणे होय. यात मंत्रांतील पदे सरळ आणि उलटी करून वाचली जातात. देवव्रत रेखे याने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी शाखेचा संपूर्ण एकाकी कंठस्थ दंडक्रम पारायण पूर्ण केले. हा अत्यंत कठीण आणि दुर्मीळ अभ्यासक्रम गेल्या २०० वर्षांत पहिल्यांदाच पूर्ण करण्यात आला आहे.

देवव्रत रेखे हा सांगवेद विश्वविद्यालय, वाराणसी येथे शिक्षण घेत आहे. त्याने २ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या ५० दिवसांच्या कालावधीत काशी येथील रामघाटवरील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत हे पारायण पूर्ण केले.

वेदमूर्ती कोण असतो? देवव्रत महेश रेखेने हे दंड कर्म पारायण पूर्ण केल्यानंतर त्याला ‘वेदमूर्ती’ ही उपाधी देण्यात आली आहे. ज्या व्यक्तीला वेदांचे सखोल ज्ञान असते आणि जो वेदांच्या कठीण पाठपद्धती पूर्ण करतो, त्याला ‘वेदमूर्ती’ म्हणून गौरवले जाते.

अहिल्यानगर ते काशीचा प्रवास :  अहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला देवव्रत रेखे याचा काशीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याचे वडील चंद्रकांत रेखे हे मोठे विद्वान असून, तेच देवव्रतचे पहिले गुरु आहेत. देवव्रतने वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षापासून वेद मंत्रांचे उच्चारण सुरू केले होते.

महाराष्ट्राची उज्वल परंपरा कायम : विशेष म्हणजे, यापूर्वी २०० वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा हा दंड कर्म पारायणाचा कारनामा महाराष्ट्रातीलच नाशिक येथील वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी केला होता. देवव्रत रेखे याने ही परंपरा पुनरुज्जीवित करत महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उज्वल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!