पुणे, दि. १५ जून – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल अचानक कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रविवारी सुट्टी असल्यामुळे कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक जण पुलावर उभे असताना अचानक पुलाचा भाग नदीत कोसळला. पावसामुळे आधीच नदीला पूर आलेला असून, प्रवाह अतिशय जोरदार आहे.
बचावकार्य सुरू असून एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहून गेलेल्या पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही काही जण अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेनंतर जुना पूल जीर्ण असूनही वापरात कसा होता, यावर प्रशासकीय हलगर्जीपणाचे आरोप होत आहेत. ना पुलाची डागडूजी करण्यात आली होती, ना कोणतीही सावधतावसूचना लावण्यात आली होती. चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीचा प्रवाह खूप वाढला आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना आणि पर्यटकांना कुंडमळा परिसरात गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल रविवारी दुपारी कोसळला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक बेपत्ता आहेत. बचावकार्य सुरू असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका होत आहे.