“हे दिवस पुन्हा येणार का?” – छत्रपती संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची हृदयस्पर्शी भेट
कोरेगाव भीमा (ता. शिरूर):शाळा म्हणजे केवळ विटा-मातीची इमारत नसते; ती असते जिथे आयुष्यभराची संस्काराची शिदोरी मिळते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. जिथे निरपेक्ष मैत्री जन्मते, आभाळाला ठेंगणं करणारी स्वप्नं रुजतात आणि चिमण्या पाखरांना बळ देत ध्येयाच्या शिखरावर झेप घेतात. आणि एक दिवस हीच चिमण पाखरे पुन्हा शाळेच्या आवारात, त्याच वर्गात, त्याच शिक्षकांच्या समोर अभिमानाने येतात. हाच गोडवा कोरेगाव भीमा येथील श्री छत्रपती संभाजी महाराज हायस्कूलच्या इयत्ता १०वी (सन २०००-०१) च्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा अनुभवला, जेव्हा दि. १ जून २०२५ रोजी तब्बल २५ वर्षांनी ते एकत्र आले. हे स्नेहसंमेलन केवळ एक भेट नव्हे, तर माजी विद्यार्थ्यांच्या यशाची गाथा, शाळेप्रतीची कृतज्ञता आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.
‘कर्तृत्वाच्या पंखांची आभाळभर गरुड झेप – श्री छत्रपती संभाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून २५ वर्षांपूर्वी दहावी पास होऊन गेलेल्या किशोरवयातील पावलांनी आज आभाळभर आपलं नाव केलंय, कर्तृत्वाच्या आणि कर्तव्याच्या क्षेत्रात आपलं एक आगळवेगळं गाव केलंय. ज्या शाळेतून त्यांनी भरारी घेतली, त्या छत्रपती संभाजी हायस्कूलचे नाव त्यांनी आता चहुदिशांना पोचवले आहे. आठवणींच्या उजेडात अनेक सवंगड्यांना व शिक्षकांना भेटून प्रत्येकच मन भरून आले. पाणावणाऱ्या डोळ्यांच्या कडा सावरत, पुन्हा एकदा हातावरील ‘छडी लागे छम छम’ हा बालपणीचा अनुभव घेत, हे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडले.
तोच बेंच, तेच सोबती अन् डोळ्यात साठलेल्या जुन्या आठवणींचा पूर! – सकाळच्या प्रसन्न वातावरणात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि दीपप्रज्वलनाने ठीक १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. या सोहळ्यासाठी शाळेचे दीपस्तंभ व आधारस्तंभ असलेले आदरणीय शिक्षक हरीशचंद्र आवारे, एन.के. पोळके, वर्षा वाजे, वृषाली काळभोर, तसेच सध्याचे मुख्याध्यापक अडुरकर सर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांच्या उपस्थितीने माजी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
“अन्…हे दिवस पुन्हा येणार का?” – जुने मित्रमैत्रिणी भेटताच वर्गातल्या आठवणी, परीक्षेची धांदल, चोरून खाल्लेले डबे, शिक्षकांचे रागावणे आणि धपाट्यांचे किस्से पुन्हा जिवंत झाले. हसता हसता डोळ्यांत पाणी आले आणि “हे दिवस पुन्हा येणार का?”असा हळवा प्रश्न अनेकांच्या मनात उमटला. प्रत्येकजण त्या सुवर्णकाळाच्या आठवणीत रमून गेला होता, जणू काही कालच ते शाळेच्या वर्गात होते! हा केवळ एक क्षण नव्हता, तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पोहोचलेल्या मित्रांनी एकमेकांना समजून घेण्याचा, जुन्या नात्यांना नव्याने उजाळा देण्याचा तो एक अनमोल दिवस होता.
हास्यविनोद आणि गप्पांच्या ओघात स्नेहाचा झरा अविरत वाहत होता, ज्यामुळे वातावरणात सकारात्मक आणि उत्साही ऊर्जा संचारली होती. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता, तर एकत्र येऊन अनुभव वाटून घेण्याचा, प्रेरणा देण्याचा आणि भविष्यासाठी नवे संकल्प करण्याचा तो एक महोत्सव होता.
आयुष्यात यशस्वी, पण शाळेच्या ऋणात कायम कृतज्ञ – या स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे आकर्षण होते ते माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मिळवलेले नेत्रदीपक यश. एकेकाळी बेंचवर एकत्र बसून अभ्यास करणारी ती मुले, आज उच्चशिक्षित इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, उद्योजक, समाजसेवक आणि राजकारणीम्हणून यशस्वी जीवन जगत आहेत. त्यांनी आपले अनुभव सांगत, शाळेने दिलेल्या संस्कारांचे आणि शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. “शाळेनेच आम्हाला यशाचे पहिले धडे दिले,”अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. आपल्या मातृसंस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत, काहींनी शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले, तर काहींनी सध्याच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, डिजिटल लर्निंग आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली. हे योगदान केवळ मदतीपुरते मर्यादित नसून, माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि पुढील पिढीला घडवण्याच्या ध्येयाचे ते प्रतीक होते.
स्नेहसंमेलन प्रसंगी सुवर्णा ढेरंगे आणि पवन कट्यारमल यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले, तर विवेक ढेरंगे यांनी मनापासून आभार मानले. सरपंच संदीप ढेरंगे, भाऊसाहेब गव्हाणे, राजश्री वाघमारे, मंजुषा भोकरे, स्वप्नील गव्हाणे आणि महेंद्र खांदवे यांनी या अविस्मरणीय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजनाने आणि स्मृतींना कायम जपणाऱ्या सामूहिक छायाचित्रांच्या सत्राने झाली. प्रत्येक फोटोमध्ये आठवणी, हसरे चेहरे आणि’पुन्हा भेटू’चा गोड भावकैद झाला होता. हे फोटो म्हणजे केवळ छबी नव्हत्या, तर मैत्री, कृतज्ञतेच्या भावनांनी भरलेले, आयुष्यभर स्मरणात राहतील असे हळवे क्षण होते.