महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सकारात्मक निर्णय देत पुढील पाच वर्षांत वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी होणार असून, यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या वर्षी वीज दरात १० टक्क्यांची कपात होणार असून, पुढील पाच वर्षांत एकूण २६ टक्क्यांपर्यंत दर कमी होतील. स्मार्ट मीटरधारकांना दिवसा वीज वापरासाठी १० टक्क्यांची अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांनाही प्रोत्साहन मिळणार असून, राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना आधीच मोफत वीज मिळत आहे.
या निर्णयामुळे कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक फायदा होणार असून, १०० युनिटपेक्षा कमी वापरणाऱ्या ७० टक्के ग्राहकांसाठी १० टक्क्यांची कपात लागू होईल.
महावितरणने नवीकरणीय ऊर्जा स्रोतांवर भर दिल्यामुळे वीज खरेदीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून दिवसा वीजपुरवठा शक्य झाला असून, विकेंद्रित सौर प्रकल्पांमुळे युनिटमागे सरासरी ३ रुपयांपर्यंत वीज तयार होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे आभार मानले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी दरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या; पण प्रथमच दरकपातीची याचिका सादर होऊन ती मंजूर झाली आहे, हे राज्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे.या निर्णयामुळे ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार असून, राज्याच्या आर्थिक प्रगतीला देखील गती मिळणार आहे.