केंदुर (ता.शिरूर) संतश्रेष्ठ कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात दिमाखाने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’, ‘कान्हुराज महाराज की जय’ अशा अखंड जयघोषात, टाळ-मृदंगांच्या निनादात, कपाळी गोपीचंद टिळा, गळ्यात टाळ, मुखात नाम आणि डोळ्यांत पंढरीच्या भेटीची असीम ओढ घेऊन हजारो वारकरी भक्तांच्या उत्स्फूर्त गर्दीतून ही पालखी पुढे सरसावली. केंद्रातील संपूर्ण परिसर हरिभक्तीच्या रंगात संपूर्ण परिसर विठू नामाच्या गजरात व भक्तिभावाच्या वातावरणात संतश्रेष्ठ कान्हुराज पाठक महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
दि. १६ जून रोजी देऊळवाड्यातून पालखीचे केंदूर मुख्य चौकात आगमन झाले. १७ जून रोजी सरपंच प्रमोद पहाड व उपसरपंच मंगेश भालेकर यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन मुख्य प्रस्थान सोहळा पार पडला. गावातून ढोल-ताशांच्या गजरात, फुगड्या खेळत, नामस्मरणात हरवलेले वारकरी भक्त आनंदात नाचत, गात प्रस्थान करताना गावातील वातावरण भक्तिमय झाले होते.
या वेळी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावतीने पूर्वा वळसे-पाटील, उर्जामंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्यावतीने स्वीय सचिव गिरीश घुले, माजी जि.प. सदस्य अॅड. नंदकुमार पिंगळे, सविता बगाटे, सविता पहाड आदी मान्यवर उपस्थित होते.पालखी ट्रस्टचे अध्यक्ष शरद राजपाठक गुरुजी, उपाध्यक्ष दत्ताप्पा साकोरे व रंगनाथ थिटे गुरुजी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कठीण काळात आळंदीहून केंदूरला आणि सर्व भावंडांना संभाळण्याचे काम ज्यांनी केले व ज्यांना ही सर्व भावंडे काका म्हणत ते संतश्रेष्ठ कान्हुराज पाठक यांचा हा पालखी सोहळा. ही पालखी सन १९७५ मध्ये बाबुराव तात्याबा थिटे, विठ्ठलराव शिर्के गुरुजी (दोघेही केंदूर), बळीराम बुवा खरपुडे (कनेरसर,ता.खेड), महादू बयाजी आगरकर व कुंडलिक शंभू आगरकर (दोघेही पाबळ, ता.शिरूर) (सर्व दिवंगत) यांच्या पुढाकाराने सुरू झाली. पुढे सहाव्याच वर्षी सन १९८१ मध्ये पंढरपूरहून पालखी परत येताना काष्टी (ता.पारनेर, जि.अहिल्यानगर) येथे पालखी ठेवलेली बोट नदीत उलटली आणि त्यात कान्हुपाठकांचे १४वे वंशज डॉ.गणेश गोपाळ राजपाठक यांना जलसमाधी मिळाली तर त्यांच्या पत्नी सरस्वती गणेश राजपाठक व रामचंद्र हरी राजपाठक यांचे या दुर्घटनेत वैकुंठगमण झाले. पुढे दहाच वर्षांनी पंढरपूरातील गोपाळपूरा पुलावर गजानन महाराज पालखीच्या हत्तीच्या व कान्हुपाठक पालखीच्या राजा नामक आश्वामध्ये चेंगराचेंगरी होवून यात राजाचा मृत्यू झाला. कान्हुराज पाठक हे नागेश सांप्रदायी असल्याने त्यांची पालखी वैष्णवांच्या मेळ्यात पंढरपूरला कशी म्हणून अनेक उलट-सुलट चर्चा होवून पालखी सोहळा बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र समस्त केंदूरकरांनी हा सोहळा तसाच उत्साहात सुरू ठेवला आणि यावर्षीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्याचे नुकतेच प्रस्थान झाले.