गोपीनाथ गड (परळी)- गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या. “गोपीनाथ मुंडे आपल्यातून गेले याला ११ वर्षे झाली, पण ते आजही आपल्या मनामध्ये आहेत. त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमांचे आयोजन करतो,” असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “अपघाताने माणसे दुरावतात आणि कधी कधी ती पुन्हा एकत्रही येतात. त्यामुळे मी वाईट काळालाही शिकण्याची संधी मानते. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, आणि मला जी जबाबदारी मिळाली आहे, ती मी प्रामाणिकपणे निभावत आहे. जर गोपीनाथ मुंडे आज असते, तर देशात मोठ्या पदावर असते. मी त्यांना तुमच्यामध्ये शोधते.”
त्यांनी दिवंगत आमदार आर. टी. देशमुख (जिजा) यांच्या स्मरणार्थ गोपीनाथ गडावर त्यांचा फोटो लावल्याची माहिती दिली. “मी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून एखादा पदार्थ सोडला आहे आणि लेकीप्रमाणे इथे तीन दिवस थांबले आहे,” असे त्या म्हणाल्या.
“हे सर्व ऋणानुबंध आहेत. यात जात-धर्माचा विषय नाही. कठीण वेळेतूनच माणूस घडतो. रावण आणि कौरवांना कधीच वनवास नव्हता, पण चांगल्या माणसांना त्रास होतोच. त्यामुळे जर तुम्ही आमच्यासोबत असाल, तर आम्ही हे सगळं सहन करण्यास तयार आहोत,” असे सांगताना त्यांचा आवाज भावनांनी भरलेला होता.