ना बडेजाव, ना डामडौल ,टोणगे कुटुंबियांनी ५० हजारांत लग्न करून दाखवलं,लग्न म्हणजे खर्च नाही, संस्कार! मराठा समाजाच्या आचारसंहितेने बदलली लग्नाची व्याख्या!
पुणे – येथे मराठा समाजाने घालून दिलेल्या आचार संहितेचे पण करत अवघ्या ५० हजारात पार पडलेले राज्यातील हे पहिलेच लग्न असेल. कळंब येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप टोणगे यांचे चिरंजीव ॲड. प्रफुल्ल व हरिदास पवार पाटील यांची कन्या ऋचा हिचा हळदी समारंभ पुणे येथे अगदी मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. हे दोघे ही उच्च शिक्षित असून, त्यांनी मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत नोंदणी पद्धतीने विवाह शुक्रवारी केला.
या विवाह सोहळ्यामध्ये ना घोडा, ना वाजंत्री , ना फटाक्यांची आतषबाजी, फक्त नवरदेवाला फेटा बांधण्यात आला होता. आहेरांची, कपड्यांची कसलीही रेलचेल नव्हती. मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रण व रूचकर भोजनाची मेजवानी. कळंब येथील माजी नगरसेवक सतीश टोणगे यांच्या पुतण्याचा हा विवाह आदर्श घेण्या सारखा पार पडला. या नोंदणी विवाह सोहळ्याप्रसंगी प्रभारी विवाह अधिकारी चंद्रकांत हाळे, नितीन जाधव, अविनाश गायकवाड यांनी कायदेशीर शपथ देऊन विवाह झाल्याचे जाहीर केले.

बागल-शिंदे कुटुंबाने आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करीत हुंडा न देता आणि डीजे न लावता साधेपणाने विवाह केला आहे. केवळ 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, ज्यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला. साखरपुडा कार्यक्रम होत असताना मराठा समाजाची बैठक झाली. यात साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय झाला. त्यांची अंमलबजावणी नक्षत्रा-जगदीश यांच्या विवाहात आली.
लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसापूर्वी सकल मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत हुंडा बंदीसाठी निर्णय घेण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमण्यात आली. मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार केली. लग्नात अनावश्यक खर्च टाळणं, हुंडा न देणं, हुंडा घेणाऱ्यावर बहिष्कार टाकणं आणि सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणं अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मराठा समाजाने तयार केलेल्या आचारसंहितेमधील प्रमुख मुद्दे
विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून, मुलगा-मुलगी यांच्या नावे एफडी केली जाईल.
काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात केली जाईल.
वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज आणि त्यावरील विभत्स नृत्य बंद केले जातील.
प्रदूषण युक्त फटाके वाजवले जाणारं नाहीत. प्री-वेडिंग शूट टाळले जातील.
विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत होईल.
विवाह सोहळ्याचा खर्च वर आणि वधू पक्षाने अर्धा-अर्धा करावा.
ज्या कुटुंबामधे महिलांचा छळ होतो, हुंडा घेतला जातो त्या कुटूंबाशी रोटी- बेटी व्यवहार समाज करणार नाही.
हुंडा घेणाऱ्या कुटुंबाला मराठा समाजातून बहिष्कृत केले जाईल.
ज्या महिलेचा सासरच्या माणसांकडून छळ होत असेल, त्या महिलेच्या माहेरची मंडळी मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.
कोणत्याही प्रकारचे ओंगळवाणे प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने आणि वेळेवर केले जातील.
मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणारं नाही. जावई मानासह सर्व मान कौटुंबिक स्वरूपात केले जातील.
मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल. विवाह सोहळ्यात एकच व्यक्ती आशीर्वादाचे भाषण देईल.