“मी मेल्यावरही तुला विसरू शकणार नाही. जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा” सुसाईड नोटने हृदय पिळवटले

Swarajyatimesnews

सोलापूरच्या दुहेरी आत्महत्येमागचं गुंतागुंतीचं नातं उघड 

सोलापूर: कर्णिकनगर परिसरात गुरुवारी (१९ जून) उघडकीस आलेल्या दुहेरी आत्महत्येने सोलापूर हादरले होते. रोहित ऊर्फ ऋग्वेद ठणकेदार (वय २३) आणि अश्विनी केशापुरे (वय २३) या युवक-युवतीने एकाच ओढणीने गळफास घेतल्याचे पाहून हे प्रेमप्रकरणातून घडले असावे, असा सुरुवातीला संशय होता. मात्र, आता या मृत्यूकांडात एक हृदय पिळवटून टाकणारा आणि धक्कादायक नवा ट्विस्ट समोर आला आहे. दोघांनीही लिहिलेल्या सुसाईड नोटने त्यांच्या नात्यातील गुंतागुंत आणि या टोकाच्या पावलामागची भीषण सत्यता उघड केली आहे.

प्रेम त्रिकोण की नात्यांची गुंतागुंत? आतापर्यंत प्रेमप्रकरण वाटत असलेल्या या घटनेत, अश्विनी आणि रोहित हे एकमेकांना बहीण-भाऊ मानत होते, हे समोर आले आहे. अश्विनीचे आदित्य नावाच्या एका मुलावर जीवापाड प्रेम होते, त्यांचे पाच वर्षांचे संबंध होते. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला. या ब्रेकअपच्या विरहातून अश्विनीने टोकाचे पाऊल उचलले आणि तिच्या या आत्महत्येमध्ये मानलेला भाऊ रोहितही सामील झाला, हे सुसाईड नोटमधून स्पष्ट झाले आहे. एकावर जीवापाड प्रेम असताना दुसऱ्यासोबत गळफास घेतल्याने हे प्रकरण अधिकच क्लिष्ट बनले आहे.

 आदित्य हा रोहितचा शाळेपासूनचा मित्र होता. अश्विनी आणि आदित्यच्या प्रेमाबद्दल रोहितला पूर्ण माहिती होती. अश्विनीला मानलेली बहीण मानणाऱ्या रोहितला आदित्यसोबतच्या तिच्या ब्रेकअपमुळे मोठा धक्का बसला होता. घटनेच्या दिवशी कर्णिकनगर येथील एका घरात रोहित आणि अश्विनी भेटले. अश्विनीने आत्महत्येचा निर्णय रोहितला सांगितल्यावर, “अश्विनीचा मृत्यू झाल्यानंतर आपण तरी जगून काय करायचं?” या विरहातून रोहितनेही तिच्यासोबत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकाच ओढणीच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आयुष्य संपवले.

सुसाईड नोटमधील हृदयद्रावक शब्द: आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधील शब्द मन हेलावून टाकणारे आहेत. त्यात म्हटले आहे की, “आम्ही दोघं बहीण-भाऊ आहोत. आई मुलगा आहोत. आम्हा दोघांना मेलेले बघून वाईट समजून घेऊ नका. जीवन जगायला नको वाटतं. त्यामुळे सगळ्यांपासून लांब चाललो, आमच्या दोघांच्या नात्याचा कोणीही वाईट अर्थ लावू नका. आम्हाला बघितल्यावर पहिले आदित्यला बोलवा. कारण आम्ही कोण आहोत, हे फक्त तोच सांगू शकतो.”

अश्विनीने आदित्यला उद्देशून लिहिले आहे, “आदि तुला वाटतं तसं नैना चांगली नाही. ती कशी आहे ना ते तू एकदा स्वतः पडताळून बघ. त्या दिवशी भांडण झालं ना, त्या भांडणात आम्ही जे बोललो ते खरं होतं. ते तुला नंतर कळेल. Best of luck aadi for your future.”आणि सर्वात हृदयद्रावक वाक्य, “मी मेल्यावरही तुला विसरू शकणार नाही. जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा.”

 तिने आपल्या आई-वडिलांनाही लिहिले आहे, “माझ्या मम्मी पप्पाला सांगा की मी जीवनाला कंटाळून गेले. जगण्याची इच्छा मेली होती. vivo फोनमध्ये रेकॉर्डिंग आहेत, ते फक्त पोलीस ऐका, आणि त्या मुलीला बोलावून विचारा. आणि आमच्या मरण्याचे कारण पण तीच आहे. कारण तिने मला आणि आदिला लांब केलं, स्वतःच्या स्वार्थासाठी. पप्पा मम्मी मी मरत आहे. कारण मी जगून पण तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. मेले तर तुम्हाला जरा बरं वाटेल. माझ्या घरचे आणि आदिची यात काहीच चूक नाही.”

या सुसाईड नोटमुळे या दुहेरी मृत्यूकांडातील अनेक पैलू आता उघड झाले असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!