हाल हाल करून मारला आमचा छावा… औरंग्याच्या औलादीला माफी मागायला लावा
मुंबई – मुघल सम्राट औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून महाराष्ट्र विधानसभेत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. औरंगजेबने माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर इस्लाम स्वीकारण्यासाठी भिक मागितली होती. त्या औरंग्याचे उदात्तीकरण काय करतो? महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबु आझमी सारख्या प्रवृत्तींना सभागृहातच आणि रस्त्यावर ठेचून काढले पाहिजे, असा संताप भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी भर सभागृहात व्यक्त केला.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप महायुतीच्या आमदारांनी आंदोलन केले. या वेळी आमदार लांडगे यांनी “हाल हाल करून मारला आमचा छावा… औरंग्याच्या औलादीला माफी मागायला लावा” अशा घोषणांचा पुनरुच्चार केला.
आमदार लांडगे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी या धर्मासाठी मरावे कसे याचा आदर्श अजरामर केला बलिदान दिले त्याग समर्पण केले. “छावा” चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या राजाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला. ज्या माझ्या राजाला औरंग्याने हाल हाल करून मारले त्या औरंग्याचे उदातीकरण करताना अबू आझमी सारख्या धर्मांध लोकप्रतिनिधीला लाज कशी वाटत नाही? असा प्रश्न लांडगे यांनी उपस्थित केला.
अबू आझमी सारख्या धर्मांध लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. स्वतःच्या भावांची क्रूरपणे हत्या करून राजा बनलेला तुझा औरंग्या आणि स्वतःच्या भावाच्या पादुका ठेवून रामराज्य करणारा भरत राजा यात फरक आहे. धर्मरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत न झुकलेला माझा राजा कुठे? आणि माझा इस्लाम स्वीकारा म्हणून माझ्या राजासमोर भीक मागणारा तुझा औरंग्या कुठे? देशात औरंग्याच्या ज्या काही लाचार अवलादी आहेत. त्याच्यामध्ये एकाने तरी विकासाच्या मुद्द्यावरती भाष्य केल्याचं दिसते का? प्रखर हिंदुत्वाचा विचार व विकासाचा संकल्प आणि स्वप्न घेऊन काम करणारे माझे हिंदुत्ववादी महायुती सरकार या औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी मी या निमित्ताने सभागृहासमोर करणार आहे, असा घणाघातही आमदार महेश लांडगे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हिंदुत्वाचा पुरस्कार करते. आमचे पंतप्रधान कुंभमेळ्यातील पवित्र स्नान करतात आणि दुसऱ्या बाजूला जगातील आर्थिक महासत्ता बनण्याचा संकल्प ही भारतवासियांच्या मनामध्ये रुजवतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा उल्लेख करत, “विकास व हिंदुत्व एकत्र घेऊन जाणारे हे सरकार अशा प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असे स्पष्ट केले. तसेच, “अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी,” अशी मागणी सभागृहात केली.